दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान दक्षिण क्षितीजावर चमकणारा एक तारा लक्ष वेधून घेत असतो. अग्नेयेकडून नैऋत्येकडे संथपणे वाटचाल करणारा हा 'अगस्ती' (Canopus) नावाने ओळखला जाणारा तारा आहे. व्याधाच्या तार्यापेक्षा थोडी कमी चमक असणारा अगस्ती खरंतर खूप दूरचा तारा आहे. तुलनाच करायची झाल्यास व्याधाचा (Sirius) तारा सूर्याच्या तीनपट मोठा असून पृथ्वीपासून सुमारे ९ प्रकाशवर्ष दूर आहे, तर 'अगस्ती' (Canopus) तारा सूर्याच्या ६५ पट मोठा असून आपल्या सौरमालेपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे.
सूर्याप्रमाणेच 'अगस्ती' ताऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते अशी पुरातन काळापासून धारणा आहे. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो, या दरम्यान अगस्ती तारा दक्षिण गोलार्धात अधिक वर येऊन चमकू लागतो. मे महिन्याच्या शेवटी हा तारा हळूहळू दक्षिण दिशेला अस्त पावू लागतो. याच्या अस्तानंतरच मान्सूनची सुरुवात होते. त्यामुळे समुद्राचे पाणी पिणारा 'अगस्ती' तारा ही ओळख त्याला मिळाली असावी.
वैदिक साहित्यामधील सर्वात जुन्या समजल्या जाणार्या ऋग्वेदामध्ये 'अगस्ती' ऋषींचा उल्लेख आढळतो. वृत्रासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर देवतांना त्रास देत होता. ब्रह्मदेवाने महर्षी दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राचा वापर करून इंद्राने वृत्रासुराचा वध केला. हे बघितल्यानंतर इतर राक्षस आपला जीव वाचवून समुद्रात जाऊन लपले. राक्षस दिवसा समुद्रात लपत असत आणि रात्री समुद्रातून बाहेर येऊन देवतांना आणि ऋषींना त्रास देत असत. या जाचाला कंटाळून देवता भगवान विष्णुंकडे गेले. भगवान विष्णुंनी त्यांना अगस्ती ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवतांनी अगस्त्य ऋषींना हा प्रकार सांगितला. समुद्रात लपलेल्या या राक्षसांना मारण्यासाठी अगस्ती ऋषींनी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकले. अखेरीस पाणी संपल्यानंतर लपलेल्या या राक्षसांचा देवतांनी वध करून त्यांची दहशत संपविली. ही कथा कधी ना कधी आपण ऐकली असेल.
अगस्ती ऋषींची अजून एक कथा रूढ आहे. मेरू पर्वताची उत्तुंग शिखरे पाहून विंध्य पर्वताला ईर्षा निर्माण झाली व त्याने त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. विंध्य पर्वताच्या वजनाच्या असंतुलनामुळे पृथ्वीच्या कालगणनेत फरक पडू लागला. त्यामुळे विंध्य पर्वताचा गर्व वाढू लागला, तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना साकडे घातले. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करत असताना अगस्ती ऋषींना वाटेत विंध्य पर्वत लागला. अगस्ती ऋषींकडे असणाऱ्या अद्भुत सिद्धी विंध्य पर्वताला माहीत होत्या. त्यांचा आदर म्हणून विंध्य पर्वताने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी 'मी दक्षिणेतून परत येईपर्यंत' त्याला त्याच अवस्थेत राहण्याची आज्ञा केली. ते दक्षिणेतून परत येतील या आशेने विंध्याचल पर्वत रांगा अजूनही तशाच झुकलेल्या अवस्थेत वाट पाहत आहेत.
विंध्य अगस्ती कथेला एक खगोलशास्त्रीय आधार आहे. काही हजार वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालींमुळे विंध्य पर्वताची उंची वाढली. त्याकाळी अगस्ती तारा विंध्य पर्वताची उंची वाढल्यामुळे पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या भूभागांवरून दिसेनासा झाला. हा काळ काही हजार वर्षांपूर्वीचा असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येणार्या काळात पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा तारा अगस्त्य ध्रुव (दक्षिण ध्रुव) बनेल आणि हे चक्र असेच चालू राहील.
याच 'अगस्ती' ऋषींचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यातून करताना दिसतात. कर्झन वायलीच्या वधानंतर इंग्लंडमध्ये सावरकरांच्या मागे ब्रिटिश पोलिसांचा ससेमिरा लागला होता. या दरम्यान ब्रायटनच्या समुद्र किनार्यावर त्यांना 'सागरा प्राण तळमळला' हे जगप्रसिद्ध विरहगीत सुचले होते. त्याच काव्याच्या शेवटच्या कडव्यात सागराला दम देण्याच्या भाषेत ते म्हणतात, तुझ्या फेसाळलेल्या लाटेच्या आवाजाने हसून मला खिजवणार्या सागरा, तू मला परत माझ्या देशी नेशील असे वचन तू मातृभूमीला दिले होते. या आंग्लभूमीला घाबरून तू माझा वचनभंग करतो आहेस. मात्र तू माझ्या (भारत) मातेला अबला समजू नकोस. कथिल हे अगस्तिस आता । रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला, सागरा, प्राण तळमळला ।। तुला आठवते का? आमचे ऋषी अगस्ती एका क्षणात तुला प्यायले होते. तुला नामशेष केले होते. अगस्तीचा वारसा सांगणारे आम्ही तुला धडा शिकवू! हतबल असतांना देखील सागराला दम देणार्या कवी मनाच्या सावरकरांचा आवाका विराट होता.
चला तर मग! सूर्याहून अनेक पटींनी मोठे असणारे अनेक सूर्य एकाच वेळी डिसेंबर जानेवारीच्या रात्रींमध्ये साध्या डोळ्यांनी पाहता येतात. या दरम्यान दक्षिण दिशेला दरवर्षी साध्या डोळ्यांनी सहज दिसणारा 'अगस्ती' तारा आकाशात शोधूया. पुराणातून, मिथकातून, आख्यायिकांतून आणि काव्यातून आलेला आपल्या ऋषीमुनींचा समृद्ध वारसा या कथांच्या माध्यमातून सर्वांना सांगूया.
आणि हो, यापुढे हा तारा पाहिल्यावर सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रायटनच्या किनार्यावर 'सागरा प्राण तळमळला' हे विरहगीत गुणगुणणारे सावरकर आणि ही कविता लिहून घेणारे त्यांचे मित्र निरंजन पाल यांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.
Disclaimer: This article reflects the personal views and experiences of the author. MAITRA 89 does not endorse the accuracy or reliability of any advice provided herein. Readers are encouraged to exercise their own judgment and seek professional expertise where necessary. The group and the website administrators are not liable for any consequences resulting from the application of this information.